हिवरा आश्रम येथे जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे उदघाटन

विवेकानंद आश्रमाची वैज्ञानिक मूल्य जोपसणारी परंपरा आहे. विज्ञान प्रदर्शनाच्या माध्यमातून बालवैज्ञानिकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. प्रत्येक घरात प्रयोगशाळा असली पाहिजे हा प.पू. शुकदास महाराजांचा विचार अंमलात आल्यास विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टीकोन वाढीस लागेल. विज्ञानातून मानवतेची निर्मिती व्हावी असे विचार आश्रमाचे सचिव संतोष गोरे यांनी बोलतांना काढले.
कर्मयोगी संत प. पू. शुकदास महाराज संस्थापित विवेकानंद ज्ञानपीठामध्ये जिल्हा परिषद विभाग व जिल्हा विज्ञान शिक्षण संघटना यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी शनिवारी ता. १५ रोजी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी. मालपाणी होते तर उदघाटक म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी पंचायत समिती मेहकरचे अनिल शेळके व जिल्हा विज्ञान पर्यवेक्षक चिंचोले हे होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला अतिरेकी हल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रध्दांजली अर्पण करून डॉ. एपीजे अब्दुल कलाम व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
यावेळी व्यासपीठावर आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते,सहसचिव विष्णुपंत कुलवंत,आत्मानंद थोरहाते, विश्वस्त पुरूषोत्तम आकोटकर, विज्ञान पर्यवेक्षक चिंचोले,विवेकानंद विद्या मंदिराचे मुख्याध्यापक कैलास भिसडे, ज्ञानपीठाचे मुख्याध्यापक निवृत्ती शिंदे,अणाजी सिरसाट, शिक्षण विस्तार अधिकारी अनिल शेळके, विज्ञान संघटनेचे उपाध्यक्ष गुजर,चिखली तालुका विज्ञान संघटनेचे भोयर,मेहकर तालुकाचे जी.एस पाटील,मोताळा तालुका धांडे,बेलाप्पा धाडकर, उपस्थित होते.
पुढे बोलताना गोरे म्हणाले की, विज्ञान प्रदर्शनीमध्ये बाल वैज्ञानिकांनी तयार केलेली उपकरणे छोटी दिसत असली तरी त्यांची संशोधन दृष्टी व मूल्य अधिक आहे. विद्याथ्र्यांमधील संशोधकवृत्ती विज्ञान प्रदर्शनातून जोपासली जाते. विज्ञान प्रदर्शनातून भावी वैज्ञानिक तयार होऊन मानवतेच्या वृध्दीसाठी व भौतिक जीवन सुखकर होण्यासाठी त्याचा लाभ व्हावा असेही त्यांनी पुढे बोलतांना सांगीतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक संजय भरती यांनी केले .

बालवैज्ञानिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद
या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक विभातून १३ विद्यार्थी,माध्यमिक विभागातून २३ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला असून लोकसंख्या शिक्षण या विषयात प्राथमिक ४ तर माध्यमिकात ८ जणांनी सहभाग घेतला आहे.